आता कृती पुढील प्रमाणे:
सर्वसाधारण विचारांचे बारीक बारीक तुकडे करून ते जुन्या कल्पनांच्या पाकात मुरत घालावेत.
शक्य असल्यास जुन्या वाळवलेल्या तत्व़ज्ञानाच्या सालीची एक चमचा भुकटी वरील पाकात चांगली कालवून घ्यावी.
नंतर यात काही उत्तम पैकी निवडलेले सारांश घालावेत. (हे सारांश शक्यतो अवकाश पेठेतून श्री. न्युटन यांच्या दुकानातून घ्यावेत, येथे बहुतेक गोष्टी निवडलेल्या व स्वच्छ मिळतात!) शिवाय नवीन विचारांच्या फोडी करून घ्याव्यात.
त्याच वेळी एकाबाजूला विरोधकांचे विचार चांगल्या पैकी मळून व तेल लावून ठेवावेत. जोडीला काही अवांतर कल्पना वाफवून घ्याव्यात.
आता पर्यंत तयार झालेले पाकातले विचार, विरोधी विचार आणि वाफवलेल्या कल्पना एकत्र करावे. आवडीनुसार कौतुकाचे केशर घालावे. चिमुटभर टिकेचे मिठ घातल्यास लज्जत वाढते.
आता हे सर्व सारण एकत्र करून एका ताटात थापून घ्यावे.
गार झाल्यावर कार्यानुसार वड्या/लाडू पाडावेत.
(भौतिकाचे कार्य असल्यास बरोब्बर चौकोनी वड्या, तत्वचिंतन वगैरे साठी असल्यास लाडू…!)
वड्या चांगल्या दिसण्यासाठी वरून गति आणि काल या विचाराचा कूट भुरभुरावा.
सकाळी लेखाच्या वड्या दिल्यावर, नवीन डिश म्हणून चूरा जेवणात द्यावा.
आपला
गुंडोपंत
Filed under: Uncategorized
Mastach aahe tumhi lihilela… ekdum fresh vatala vachtana… keep it up