मागे एका छायाचित्रावरून
शेंदूर लावलेला दगड म्हणजे देव काय अशी काहीशी चर्चा झाली होती.
ही चर्चा परत आठवली कारण विनोबांचे गीता-प्रवचने हे पुस्तक वाचत होतो.
त्यात तत्सम संदर्भाचा उल्लेख आहे.
या पुस्तकातील गीतेच्या पाचव्या अध्यायाचे विवरण मांडतांना आणि स्पष्टीकरण करतांना विनोबांनी काही सुंदर उदाहरणे दिली आहेत.
ही उदाहरणे एखाद्या माणसाच्या सोई साठी ‘शालीग्रामाच्या पींडीत परमेश्वर माना’ या संकल्पनेच्या पुष्ट्यर्थाने दिली आहेत.
कारण काही गोष्टी ‘मानल्या’ शिवाय पुढे जाता येत नाही. किंवा विषय स्पष्ट होत नाही.
विनोबा म्हणतात, ‘
जसे भूमितीमध्ये म्हणतात ना की अ, ब, क हा त्रिकोण आहे असे ‘समजा’. समजा का? कारण, या त्रिकोणातील रेखा यथार्थ रेखा नाहीत म्हणून. रेखेची मुळीं व्याख्यांच अशी आहे की तिला लांबी आहे पण रुंदी नाही. ही लांबी रुंदी शिवाय लांबी फळ्यावर काढायची कशी? लांबी आली की रुंदी आलीच. जी रेखा काढाला तिला थोडी तरी रुंदी राहणारच. म्हणून भुमितीशास्त्रात रेखा ‘मानल्या’ शिवाय चालतच नाही. भक्तिशास्त्रात असेंच नाही का? तेथेही या लहानशा शालिग्रामाच्या पिंडीत सर्व ब्रह्मांडाचा धनी आहे असे ‘माना’, असे भक्त म्हणतो कोणी जर असे म्हणेल , हें काय खूळ? तर त्याला सांगा, तुझें हें भूमितीचे काय खूळ आहे? चांगली ठसठसशीत जाड रेखा दिसत आहे व म्हणे ‘ही रुंदी शिवायची माना’ हे काय खूळ आहे?’
विनोबा इतरही गोष्टींचा उहापोह करतात, जसे की परमेश्वर तर तुटत नाही फुटत नाही, मग पिंड पण फुटायला नको… पण ते योग्य नाही, आपटली तर पिंड फुटणार, कारण त्यात परमेश्वर ‘मानलेला’ आहे.
पुढे विनोबा भूमितीतील बिंदू चा आढावा घेतांना म्हणतात, ‘बिंदू म्हणे माना. आणि फळ्यावर बिंदू काढतात. बिदु कसचा? ते चांगले वर्तुळच असते. बिंदुची व्याख्या म्हणजे ब्रह्माचीच व्याख्या.* बिंदूला लांबी रुंदी जाडी काहीच नाही. परंतु त्याची अशी व्याख्या करून तो फळ्यावर मात्र काढतात. बिंदू तर अस्तित्वमात्र आहे, त्रिपरिमाणरहित आहे. सारांश खरा त्रिकोण, खरा बिंदू हे व्याख्येतच आहेत. परंतु ते आपणास गृहीत धरावे लागते. भक्तिशास्त्रातही शालिग्रामात न फुटणारा सर्वव्यापी देव मानावा लागतो.’ (पान ४४-४५:विनोबा).
भक्तीशास्त्रा प्रमाणे – हो विनोबा भक्तिला शास्त्रच म्हणत आहेत – मात्र जुन्याकाळी या सार्याच गोष्टींना शास्त्र अशीच संज्ञा होती -
नवीन शास्त्राच्या संकल्पनेत ही बसत नाही पण तूर्तास ते बाजूला ठेवायला हरकत नाही!
तसेच इतरही अनेक ज्ञानशाखांत असे ‘मानणे’ गरजेचे ठरते.
परंतु मला बिंदू व्याख्येप्रमाणे दिसत नाही, रेखा व्याख्येप्रमाणे दिसत नाही म्हणून मी भूमितीच नाकारली तर?
जेथे रेखाच अस्तित्वात दाखवता येत नाही, तेथे पायथागोरसचे प्रमेय ही एक भंपक कल्पना आहे,
असे म्हणू लागलो तर ती आत्मवंचना ठरेल. माझ्या फाद्यासाठी, ज्ञानासाठी तेथे संकल्पना ‘मानून’ पुढे जाणेच मला योग्य आहे.
असेच काहीसे ज्योतिषातही आहे असे मला वाटते.
त्यात अनेक संकल्पना ‘मानल्या’ गेल्या आहेत. प्रत्येकच संकल्पनेला ‘मूर्त स्वरूप दिसत नाही’ म्हणून नाकारतच बसलो तर काहीच हाती लागणार नाही. पण काही काळ ‘मानणे’ उपयोगात आणले आणि त्या ज्ञानाचा, अनुमानांचा निरपेक्ष आणि स्थिरबुद्धीने आपल्या आयुष्याशी ताळा घेवून पाहिला असता काही गोष्टी मला विस्मयकारक रितीने दिसतात. म्हणून माझा रस त्या क्षेत्रात जागृत झाला. मग अभ्यासाची सुरुवात झाली. जसा पुढे गेलो तसा त्याची व्याप्ती कळू लागली. माझे खुजेपणही जाणवू लागले.
येथे मला ज्योतिष्याचे समर्थन करायचे नाही.
परंतु ते ज्ञान नाकारूनच टाकण्यानेही आपल्या हाती काही पडेल असे वाटत नाही.
माझा स्वतःचा प्रवास ज्योतिष विरोधक ते ‘यात काही तरी तथ्य आहे काय ते यातले फालतू विचार दूर सारून ते शोधले पाहिजे’ असाच झाला आहे.
राहता राहिला विषय ज्योतिषातल्या भंपक लोकांचा.
मग मी असे विचारतो की, कोणत्या क्षेत्रात भंपक लोक नाहीत?
मला काही अतिशय भंपक आणि कोणतीही शास्त्रीय ज्ञानाची बैठक नसलेले म्याकॅनिकल इंजिनियर्स माहिती आहेत.
म्हणून मी म्याकॅनिकल इंजिनियरींग ही शाखाच भंपक आहे असे म्हणू लागलो तर काय अर्थ आहे?
कदाचित वितंडवाद घालून मला तत्क्षणी विजयीही होता येईल, पण त्यात नुकसान माझेच असेल, असे मला वाटते.
कोणत्याही क्षेत्रात काही खडे असायचेच.
पण खडे आहेत म्हणून तांदूळ टाकून द्यायचे की खडे बाजूला करून
तांदूळाचा भात करायचा हे आपणच ठरवायचे असते.
आपला
गुंडोपंत
संदर्भः
विनोबा, गीता प्रवचने (१९३२), परंधाम प्रकाशन, पवनार, आवृत्ती २००७.
*येथे विनोबा ब्रह्म म्हणजे काय? हे किती छान सांगून गेले आहेत!
Filed under: Uncategorized | Tagged: ज्योतिष, विनोबा | Leave a Comment »